‘या काळात या क्षेत्रातून सरळ मोक्ष प्राप्ति शक्य नाही’ असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु दीर्घकाळापासून महाविदेह क्षेत्रात, श्री सीमंधर स्वामींच्या’; दर्शनाने मोक्षप्राप्तीचा मार्ग तर चालूच आहे ना ! संपूज्य दादाश्री त्याच मार्गाने मुमुक्षुंना मोक्षाला पोहोचविण्यात निमित्त आहेत, आणि मुमुक्षुंना ह्या मोक्षप्राप्तीची खात्री निश्चयाने प्रतीत होत असते. या काळात, या क्षेत्रात तीर्थंकर नाहीत, पण या काळात महाविदेह क्षेत्रात वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भगवंत विराजमान आहेत,आणि ते भरत क्षेत्रातील मोक्षार्थी जीवांना मोक्ष प्राप्ति करविण्यासाठी प्रबळ निमित्त आहेत. ज्ञानीपुरुष स्वतः त्या मार्गाने प्राप्ति करून इतरांना तो मार्ग दाखवतात. प्रत्यक्ष-प्रकट तीर्थकरांची ओळख होणे, त्यांच्याप्रति भक्तिभाव जागृत होणे, आणि रात्रंदिवस त्यांचे अनुसंधान करून शेवटी त्यांचा प्रत्यक्ष दर्शनाने केवळज्ञान प्राप्त होणे, हाच मोक्षप्राप्तीचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास (मार्ग) आहे. असे ज्ञानींनी सांगितले आहे. श्री सीमंधर स्वामींची आराधना जेवढी अधिक प्रमाणात होईल तेवढेच त्यांच्यासोबतचे अनुसंधान सविशेष रूपाने होईल. यामुळे त्यांच्याबरोबरचे अनुसंधान प्रगाढ होईल. शेवटी परम अवगाढ दशेपर्यंत पोहोचून त्यांच्या चरणकमळातच स्थान प्राप्तीची मोहोर लागते.